उद्योग

रेणाखळी शिवारात बिबट्याचा वावर; सलग हल्ल्यांनी शेतकरी भयभीत!


पाथरी:लोक योध्दा प्रतिनिधी
तालुक्यातील रेणाखळी व वरखेड शिवारात बिबट्याचा वाढता वावर दिसून येत असून, सलग दोन जनावरे ठार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ दिवसांपासून बिबट्या सतत शेतशिवारात फिरत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून सातत्याने नोंदवल्या जात आहेत.

27 रोजी रेणाखळी शिवारातील संदीपान अंबादास श्रावणे व 30 नोव्हेंबर रोजी प्रमोद भास्करराव हरकळ यांच्या शेतातील (गट नं. 314/365) दोन जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी ए. एन. जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अंकुश जाधव व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पाऊलखुणा, हल्ल्याचा पद्धतीतून हा हल्ला बिबट्याचाच असल्याची खात्री करण्यात आली.

बिबट्याच्या वाढत्या हालचाली लक्षात घेता वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्याचे काम सुरू केले असून, गरज पडल्यास पिंजरा लावण्याचाही निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी रात्री शेतात न जाणे, जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधणे, उजेडाची सोय ठेवणे अशा सूचनाही विभागाने दिल्या आहेत.

सलग हल्ल्यांनंतर रेणाखळी–वरखेड परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे. शेतकऱ्यांच्या जीवितासह जनावरांच्या सुरक्षेसाठी बिबट्याला तातडीने पकडण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे. वनविभाग परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे.

परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून सध्या तोड चालू असल्याने कारखान्यांच्या मजुरांच्या टोळ्या ठिकठिकाणी बसलेल्या असून त्यांच्यासोबत लहान लेकरे बाया माणसं असल्याने त्यांच्यातही घबराट सुटली असून कामावर जाण्याची धास्ती वाटत आहे.


लोक योद्धा

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *