बालविवाह प्रथा थांबविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे गरजेचे — जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
– अहमद अन्सारी, प्रतिनिधी पाथरी ,

जि. परभणी
परभणी, दि. 13 नोव्हेंबर 2025 – “बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून सामाजिकदृष्ट्याही अत्यंत घातक प्रथा आहे. या प्रथेला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (दि. 11) ‘बालविवाहमुक्त महाराष्ट्र – आपला संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत बालविवाह प्रतिबंधासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधींनी ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिर्गे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी रेखा काळम, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आम्रपाली पाचपुंजे, चाईल्ड लाईन समन्वयक संदीप बेंडसुरे, पर्यवेक्षक अधिकारी श्री. तांदळे, एस.बी.सी. 3/युनिसेफ चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळू राठोड, कैलास सत्यार्थी फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक लक्ष्मण गायकवाड, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, लग्नसेवा पुरवठादार, कापड व किराणा दुकानदार, सोनार, बँडवाले, मंगलकार्यालय मालक, प्रिंटिंग प्रेस संघटना, तसेच विविध धर्मगुरू – ब्राह्मण/पुरोहित, काजी/मौलवी व बौद्ध भदंत यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले की, “परभणी जिल्ह्यातील बालविवाहाचे प्रमाण शून्य करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. प्रत्येकाने जबाबदारीने काम केल्यास हे शक्य आहे. शाळेत गैरहजर राहणाऱ्या मुलींची माहिती घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे आवश्यक आहे. बालविवाह रोखणे ही सामाजिक बांधिलकी असून ग्रामसभांमध्ये ‘बालविवाह होणार नाही’ असा ठराव संमत केला पाहिजे. ही चळवळ लोकचळवळ बनावी. शाळांमध्ये प्रार्थनेप्रमाणेच दररोज ‘बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा’ घेतली जावी आणि 1098 या चाईल्ड हेल्पलाईनची जनजागृती सर्वत्र व्हावी.”
या अभियानात पोलिस यंत्रणा, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आणि आशा स्वयंसेविका यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडाव्यात, असेही आवाहन करण्यात आले. धर्मगुरूंनी या मोहिमेत सक्रिय सहभागाची ग्वाही दिली.
बाळू राठोड (युनिसेफ) यांनी सांगितले की, मागील तीन महिन्यांत 100 गावांमध्ये पालकांबरोबर जनजागृती मोहीम राबवण्यात आली असून, 100 शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खेळांच्या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले आहेत.
बैठकीचे सूत्रसंचालन संदीप बेंडसुरे यांनी केले, तर आभार मोनिका रंधवे यांनी मानले.

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे





