उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई! तहसीलदारांचा कडक इशारा!
उध्दव इंगळे,लोक योद्धा न्युज संपादक
पाथरी प्रतिनिधी : पाथरी येथील तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी भारत गंगावणे यांनी कार्यालयीन शिस्तीबाबत कठोर भूमिका घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. वेळेत कार्यालयात न पोहोचणाऱ्या कर्मचाऱ्यांवर रजा कपात आणि प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी परिपत्रकाद्वारे दिला आहे.
१२ मे रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, १३ मेपासून तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून नियमितपणे कामकाज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रशासन अधिक प्रभावी, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
कार्यालयीन वेळेनुसार गट ‘ड’ कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३०, तर गट ‘अ’ ते ‘क’ कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. सर्वांनी निर्धारित वेळेत उपस्थिती नोंदवहीत सही करणे अनिवार्य राहणार आहे.
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, सलग तीन दिवस उशिरा येणाऱ्या अथवा वेळेचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांची एक दिवसाची रजा कपात केली जाईल. वारंवार सूचना देऊनही वेळेवर कार्यालयात न येणाऱ्यांची त्या दिवसाची अनुपस्थिती ग्राह्य धरून विनावेतन नोंद केली जाईल. तसेच संबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे.
नव्याने रुजू झाल्यानंतर तहसीलदार भारत गंगावणे यांनी प्रशासनातील ढिसाळपणाला आळा घालण्यास सुरुवात केली असून शिस्त, वेळेचे पालन आणि नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर दिला आहे. या निर्णयामुळे तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये हलचाल सुरू झाली असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे





