दिवसा ढवळ्या पत्रकाराच्या घरावर डल्ला; पाथरीत चोरट्यांची दहशत!
— उध्दव इंगळे लोक योध्दा न्यूज संपादक
गौतमनगरमध्ये धाडसी चोरी; २.६६ लाखांचा ऐवज लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पाथरी (प्रतिनिधी) :
पाथरी शहरात दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांनी पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, थेट एका पत्रकाराच्या घरावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने शहरात खळबळ उडाली आहे. गौतमनगर परिसरातील प्रजागर्जना वृत्तपत्राचे संपादक विठ्ठल किशनराव साळवे यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा धाडसी चोरी करत घराचे दरवाजे व कपाटे फोडून ७१ हजार रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ६६ हजार ८६२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
ही घटना दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १ ते ४ वाजेदरम्यान, घरात कोणीही नसताना घडली. सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणी विठ्ठल साळवे यांच्या तक्रारीवरून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ०७०५, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३३१(३) व ३०५(अ) नुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, पाथरी शहरात गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्या चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी माळीवाडा येथील साहेबराव मानोलीकर यांच्या घरी झालेल्या चोरीत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते, तर तुकाराम गायकवाड यांच्या निवासस्थानीही अशीच धाडसी चोरी घडली होती. आता गौतमनगरमधील या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, रात्र-दिवस पोलीस गस्त वाढवावी, तसेच मुख्य चौक व वसाहतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केंद्रे व पोलीस उपनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे






