पाथरी कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्तीच्या उंबरठ्यावर? स्वारस्य अभियोक्ती व अनियमित बांधकामप्रकरणी १८ संचालकांना कारणे दाखवा नोटीस**
स्वारस्य अभियोक्ती व अनियमित बांधकामप्रकरणी १८ संचालकांना कारणे दाखवा नोटीस*
लोक योध्दा न्युज
पाथरी / प्रतिनिधी
पाथरी येथील पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान १८ संचालकांना स्वारस्य अभियोक्ती, अनियमित बांधकाम तसेच प्रशासकीय कामकाजातील कथित कसूर प्रकरणी जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी २५ फेब्रुवारी रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती अधिनियमातील कलम ४५(१) अंतर्गत “आपले संचालक पद का अपात्र करू नये?” असा सवाल संबंधितांना करण्यात आला असून, समितीची वाटचाल बरखास्तीकडे होत असल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.
नोटीसनुसार सर्व १८ संचालकांना १३ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता जिल्हा उपनिबंधक कार्यालयात लेखी खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सादर होणारा खुलासा समाधानकारक न ठरल्यास अपात्रतेची कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
*तक्रारींची पार्श्वभूमी*
मागील दशकात आदर्श बाजार समिती म्हणून राज्यात लौकिक मिळवलेल्या या समितीवर गेल्या दीड वर्षांपासून राजकीय हालचालींचे सावट आहे.
१ जानेवारी २०२५ रोजी अशोक गिराम व इतर सहा संचालकांनी स्वारस्य अभियोक्ती व बांधकाम अनियमिततेबाबत तक्रार दाखल केली होती.
३० जानेवारी २०२५ रोजी अमोल धनले यांनी स्वतंत्र तक्रार अर्ज सादर केला.
२५ नोव्हेंबर २०२५ रोजी अशोक गिराम व प्रभाकर शिंदे यांचाही तक्रार अर्ज प्राप्त झाला.
२७ नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार राजेश विटेकर यांनी बाजार समिती प्रशासनात स्थैर्य यावे, या हेतूने पत्रव्यवहार केला होता.
या सर्व तक्रारींच्या अनुषंगाने सहाय्यक निबंधक, सेलू व पूर्णा यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारे जिल्हा उपनिबंधकांनी ही कारवाई केली आहे.
सत्तासमीकरणांवर परिणाम?
नुकत्याच सभापती व उपसभापतींच्या गैरहजेरीत पार पडलेल्या बैठकीची चर्चा सुरू असतानाच सर्व संचालकांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आल्याने बाजार समितीतील सत्तासमीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना या कारवाईमुळे नवे वळण मिळाले असून, पुढील निर्णयाकडे शेतकरी, व्यापारी व संबंधित घटकांचे लक्ष लागले आहे.

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे





