गोदावरी काठावर वाळू माफियांची उघडी दहशत तहसीलदारांसमोरच महसूल पथकाला धमक्या; १२ जणांवर गुन्हा, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

लोक योद्धा न्यूज |
पाथरी प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील गुंज शिवारात गुरुवारी पहाटे घडलेली घटना राज्यातील वाढत्या वाळू माफियांच्या दहशतीचे भीषण चित्र समोर आणणारी ठरली आहे. गोदावरी नदीपात्रातील अवैध वाळू उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला तहसीलदारांच्या उपस्थितीतच शिवीगाळ, दमदाटी आणि पाठलागाचा सामना करावा लागला. ही घटना १९ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली असून २० फेब्रुवारी रोजी पाथरी पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहाटेची धाड, उघडकीस अवैध उत्खनन
मिळालेल्या माहितीनुसार, गुंज येथील खडकी पुलाजवळ गोदावरी नदीपात्रातून ट्रॅक्टर-लोडर व टिप्परच्या साहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती तहसीलदार शंकर हांदेशवार यांना मिळाली होती. त्यानुसार तलाठी सचिन बाबुराव साबळे आणि शिपाई यादव राक्षे यांच्यासह महसूल पथकाने पहाटे सुमारे चारच्या सुमारास घटनास्थळी धाड टाकली. तेथे टिप्परमध्ये वाळू भरली जात असल्याचे आढळले.
कारवाईदरम्यान ट्रॅक्टर-लोडरची चावी ताब्यात घेताच चालक घटनास्थळावरून पसार झाला. काही वेळातच वाहनमालक प्रल्हाद गायकवाड (रा. गुंज) घटनास्थळी दाखल झाला. “सगळीकडे वाळू चोरी सुरू आहे, फक्त माझीच वाहने दिसतात का?” असा सवाल करत त्याने थेट तहसीलदार व कर्मचाऱ्यांशी वाद घातला.
काठ्या घेऊन जमाव; महसूल कर्मचाऱ्यांचा पाठलाग
दरम्यान, गावातून काठ्या घेऊन लोकांना बोलावण्यात आले. काही मिनिटांतच १० ते १२ जण मोटारसायकलवरून घटनास्थळी जमा झाले. तहसीलदारांसमोरच अश्लील शिवीगाळ करत “वाहने कशी नेतात ते पाहतोच” अशा शब्दांत धमक्या देत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. परिस्थिती चिघळल्याने महसूल पथकाला माघार घ्यावी लागली. एवढ्यावरच न थांबता संबंधितांनी महसूल कर्मचाऱ्यांचा गावापर्यंत पाठलाग करून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दहशतीचे सावट; प्रशासनाची कसोटी
तहसीलदारांच्या उपस्थितीतच असा उन्मत्तपणा घडल्याने वाळू माफियांचे धाडस किती वाढले आहे, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. “जर तहसीलदारांनाच धमक्या दिल्या जात असतील, तर सामान्य नागरिकांची काय अवस्था?” असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे. महसूल विभागातील प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
गोदावरी किनारी भागातील काही तलाठी वर्षानुवर्षे एकाच सज्जावर कार्यरत असल्याची चर्चा असून, स्थानिक हितसंबंध जुळल्याच्या शक्यतेवरही कुजबुज सुरू आहे. संबंधित सज्जांवरील बदल्या झाल्यास अवैध उत्खननावर अंकुश बसेल, असे मत व्यक्त होत आहे.
कठोर कारवाईची मागणी
गोदावरी खोऱ्यातील अवैध वाळू उत्खनन हा केवळ महसुली तोट्याचा प्रश्न नसून पर्यावरणीय हानीचाही गंभीर मुद्दा आहे. नदीपात्राची धूप, भूजल पातळीतील बदल आणि पूरस्थितीचा धोका वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशा पार्श्वभूमीवर महसूल पथकावरच दडपशाही होणे ही अत्यंत चिंताजनक बाब ठरते.
राज्य सरकारने वाळू माफियांविरोधात कठोर धोरणाची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्ष कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनाच धमकावले जात असल्याने प्रशासनाची पकड किती मजबूत आहे, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यस्तरावरून या घटनेकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कठोर आणि उदाहरणार्थ कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे.
गोदावरी काठावरील ही घटना वाढत्या वाळू माफिया साखळीचे गंभीर संकेत देणारी ठरत असून, प्रशासनासाठी ही निर्णायक कसोटी ठरणार आहे.
—

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे





