जनता दरबारातून आ. विटेकरांनी सोडवले नागरिकांचे प्रश्न, अधिकाऱ्यांना दिले तातडीच्या कार्यवाहीचे आदेश

उध्दव इंगळे, लोक योद्धा न्युज संपादक
पाथरी, प्रतिनिधी ५ मे : पाथरी तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी आमदार राजेश विटेकर यांच्या पुढाकाराने सोमवारी पंचायत समितीच्या सभागृहात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी अडीच ते साडेचार या वेळेत झालेल्या या दरबारात नागरिकांनी वीजपुरवठा, घरकुल योजना, शेतरस्ते आणि बांधकाम कामगारांच्या प्रश्नांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी मांडल्या.
वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व कमी दाबाने मिळत असल्याने शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत, तसेच अनेक ठिकाणी विद्युत पोल जीर्ण होऊन तारा लोंबकळत असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. यावर महावितरणच्या अभियंता डिग्रसकर यांनी तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर घरकुल योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार बांधकाम साहित्य थेट घरपोच मिळावे, अशा स्पष्ट सूचना आ. विटेकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
बांधकाम कामगारांच्या शिष्यवृत्ती व अपघात विमा योजनांबाबत प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश बांधकाम अधिकारी कराड यांना देण्यात आले. शेतरस्ते व पांदन रस्त्यांची कामे रखडल्याने शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता, तहसीलदार व इतर संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देशही आमदारांनी दिले. दरम्यान, काही विभागांचे प्रमुख अधिकारी जनता दरबारास गैरहजर असल्याचे दिसताच आ. विटेकर यांनी त्यांना थेट दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यास सांगितले.
यापूर्वी सकाळच्या सत्रात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पाथरी, मानवत, सोनपेठ व परभणी या चार तालुक्यांची खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आ. विटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आगामी खरीप हंगामासाठी खत व बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्यावर भर देण्यात आला. तसेच पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना, सूक्ष्म सिंचन योजना आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. हंगामात खत-बियाण्यांचा कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये आणि सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने व वेळेत मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आ. विटेकर यांनी बजावले.
या दोन्ही कार्यक्रमांना जि.प. सदस्य अरुण कोल्हे, मदनराव भोसले, सभापती सुनीता डुकरे, उपसभापती सचिन अंबुरे, गटविकास अधिकारी शैलेश वाव्हळे, तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे यांच्यासह इतर अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे





