पाथरीत जनतेचा लोकशाहीला सलाम! शांततेत तब्बल ७७.३४% विक्रमी मतदानाने रंगला मतदानोत्सव–

उध्दव इंगळे:पाथरी
प्रतिनिधी
नगर परिषद पाथरी सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवार, २ डिसेंबर रोजी पाथरीकरांनी लोकशाहीप्रती असलेला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित करत तब्बल ७७.३४ टक्के विक्रमी मतदान नोंदवले. सकाळी ६.३० वाजता मॉकपोलनंतर ७.३० पासून अधिकृत मतदानास प्रारंभ झाला आणि सुरुवातीपासूनच शहरातील बहुतेक केंद्रांवर शिस्तबद्ध रांगा दिसू लागल्या.
दुपारी १.३० वाजेपर्यंत ४१.९०% आणि ३.३० पर्यंत ५८.६५% मतदान झाले होते. सायंकाळपर्यंत मतदारांचा ओघ कायम राहिल्याने अंतिम टक्केवारी झपाट्याने वाढत गेली. अखेर २७,२३१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत ७७.३४% मतदानाचा टप्पा गाठला.
जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी — “मतदान प्रक्रिया आदर्श व शांततापूर्ण”
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आयटीआय पाथरी व नेताजी सुभाष विद्यालय मतदान केंद्रांची पाहणी करत मतदान प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. तसेच आयटीआयच्या स्ट्रॉंग रूमची तपासणी करून सुरक्षा व्यवस्थेचे पुनरावलोकन केले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची दिवसभर पाहणी…
निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देत मतदानाची गती, सुविधा आणि महिलांसह अपंग मतदारांचा सहभाग तपासला. पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने दिवसभर संपूर्ण शहरात अत्यंत शांत, सुरक्षित आणि सुरळीत वातावरण राहिले.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी युवराज पौळ, कृष्णा देशमुख, प्रज्ञावंत कांबळे, राजेश काटकर, गणेश शिंदे, दत्ता गिनगिने, सतीश रेड्डी आदी अधिकारी दिवसभर सक्रिय राहिले.
*नेते व कार्यकर्त्यांचा हिरमोड*….
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नगरपरिषदेची मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
मतमोजणी लांबणीवर पडल्यामुळे उमेदवार, नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये निराशा व हिरमोड झाल्याचे चित्र दिसत आहे. १८ दिवसांनी होणाऱ्या मतमोजणीमुळे राजकीय उत्सुकता आणखी वाढली आहे
आर्थिक प्रलोभनांच्या चर्चांमुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला…
पाथरी नगर परिषद निवडणुकीत उमेदवारांनी मतदारांना आर्थिक भेटी दिल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा शहरभर रंगली आहे. त्यामुळे मतदानानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले असून आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरकडे लागले आहे.
विक्रमी मतदान, उच्च न्यायालयाचा मतमोजणीवरील विलंब आणि शहरात सुरू असलेल्या विविध चर्चांमुळे निकालाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे





