⚡रेणाखळीतील शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात संतापाचा सूर!
अतिवृष्टीचे अनुदान अजूनही न मिळाल्याने ग्रामपंचायतीचे तहसीलदारांना निवेदन — उपाय न झाल्यास उपोषणाचा इशारा

“अतिवृष्टीत पिकं वाहून गेली… पण भरपाई मात्र अजूनही नाही!”
अशा शब्दांत मौजे रेणाखळी (ता. पाथरी, जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केल्यानंतर अनेक दिवसांनंतर ही कालावधी उलटला, तरीही रेणाखळीतील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयादेखील जमा झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर रेणाखळी ग्रामपंचायतीतर्फे तहसीलदार, पाथरी यांना तातडीने कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आले.
हे निवेदन ग्रामपंचायत सरपंच राहुल लिंबाजी ब्रम्हराक्षे यांच्या नेतृत्वाखाली सादर झाले. या वेळी उपसरपंच शेख अनीसोद्दीन, तसेच शेख सलीमोददीन, महादेव हरकळ, गणेश हरकळ, शेख राजू, बापूराव हरकळ, शेख निसार, शेख अनीस यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात्मक भूमिकेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. सुरेश (बप्पा) ढगे यांनी थेट उपस्थित राहून पाठिंबा दिला.
श्री. ढगे यांनी प्रशासनाकडे तातडीने शेतकऱ्यांच्या अनुदानाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
“अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, ऊस, मुग, तुर या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पावसाने जमिनी खरडून गेल्या, विहिरींचे व शेतीसाधनांचे नुकसान झाले. काहींना मदत मिळाली असली तरी बहुसंख्य शेतकऱ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही.”
ग्रामपंचायतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की,
“जर शासनाने तात्काळ उपाययोजना करून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा केले नाही, तर ग्रामपंचायतीतर्फे तहसील कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने उपोषण करण्यात येईल.”
या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आली असून, अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीयुक्त यादी निवेदना सोबत जोडण्यात आली आहे.
🗣️ “शेतकऱ्यांची जमीन गेली, पिकं गेली, पण भरपाई मात्र अद्यापही येत नाही… शासनाने तातडीने न्याय द्यावा!”
— राहुल ब्रम्हराक्षे, सरपंच, रेणाखळी

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे





