दुर्राणींचा जोरदार वार — नखाते सत्तेबाहेर?

१२ संचालकांच्या स्वाक्षऱ्यांसह अविश्वास ठराव दाखल; पाथरी कृउबा राजकारणात मोठा भूकंप!
उध्दव इंगळे– लोक योद्धा न्यूज |
पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेच्या गाभ्यात मोठा राजकीय स्फोट घडला आहे. सभापती अनिलराव नखाते यांच्या विरोधात तब्बल १२ संचालकांच्या स्वाक्षऱ्यांसह अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असून, या घटनेने पाथरी तालुक्याच्या राजकीय वातावरणात अक्षरशः भूकंप घडवून आणला आहे.
हा ठराव शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम २३(अ) नुसार दाखल करण्यात आला.
*अविश्वास ठरावाचे मुद्दे आणि संचालकांची यादी*
ठरावावर खालील १२ संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत —
एकनाथ रामचंद्र घांडगे, किरण भागिरथराव टाकळकर, संतोष जगन्नाथ गलबे, संजीव मारोतराव सत्वधर, गणेश सखाराम दुगाणे, शेख दस्तगीर शेख हसन, शाम उत्तमराव धर्मे, विजयकुमार तुळशिराम शिताफळे, अशोक उत्तमराव आरबाड, संदिप शिवाजीराव टेंगसे, आनंद लक्ष्मणराव धनले आणि स. गालेब स. इस्माईल.
तर तेरावे संचालक अमोल ओमप्रकाश बांगड हे परराज्यात असल्याने ठरावावर स्वाक्षरी नसली तरी त्यांनीही ठरावाच्या बाजूने भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सभापतींवर गंभीर आरोप
अविश्वास ठरावात सभापती अनिलराव नखाते यांच्यावर मनमानी कारभार, आर्थिक व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव, संचालकांचा सल्ला न घेणे आणि स्वतःच्या कुटुंबीयांना योजनांचे लाभ देणे अशा गंभीर आरोपांचा उल्लेख आहे.
ठरावात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की,
“सभापतींनी संचालकांचा विश्वास गमावला असून, समितीचा कारभार वैयक्तिक फायद्यासाठी वळवण्यात आला आहे.”
💥 गटबाजीच्या पलीकडे नव्या समीकरणांची जुळवाजुळव
– या ठरावावर सही करणाऱ्या संचालकांपैकी अर्ध्याहून अधिक माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या गटातील आहेत, तर शिवसेना (शिंदे गट) नेते सईद खान यांच्या गटातील काही संचालकांनीही ठरावाला पाठिंबा दिला आहे.
यामुळे पाथरी तालुक्यात गटबाजीच्या सीमारेषा ओलांडून नव्या सत्तासमीकरणांचा प्रारंभ झाल्याचे दिसत आहे.
⚡ “दुर्राणी गटाने नखाते यांच्याविरोधात थेट रणशिंग फुंकले; खान गटातील संचालकांचाही पाठिंबा मिळताच परिस्थिती पलटी झाली!”
🧳 ठरावानंतर संचालकांची सहल – राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय!
ठराव दाखल होताच सर्व संचालक सहलीसाठी रवाना झाल्याची चर्चा असून, राजकीय वर्तुळात “ठरावानंतरची सहल की साजरी?” असा सवाल उपस्थित झाला आहे.
दरम्यान, सईद खान यांना या ठरावाची पूर्वकल्पना नसल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्या गटातील संचालकांनी विश्वासात न घेता ठरावावर सही केल्याची माहिती आहे.
🏛️ दुर्राणींचे पुनरागमन — जिल्हा राजकारणात धडाका
— या ठरावाच्या सादरीकरणावेळी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. नुकतेच त्यांच्या हाती काँग्रेस जिल्हाध्यक्षपद आल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी या हालचालीद्वारे जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार पुनरागमन केले आहे.
या घटनामुळे राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसला असून, पंचायत समितीपासून जिल्हा परिषद, नगर परिषद, अगदी महानगरपालिका निवडणुकांपर्यंत या घटनेचे दूरगामी राजकीय परिणाम होतील, अशी चर्चा रंगत आहे.
“कृउबा ते जिल्हा – सर्व सत्तासमीकरणात हलचल; पाथरीत राजकीय रंगत चढली!”
राजकीय निरीक्षकांच्या मते, हा ठराव केवळ बाजार समितीपुरता मर्यादित नसून आगामी राजकीय समीकरणांचा ट्रेलर आहे. पाथरी तालुक्यात आता नव्या आघाड्या, नवी समीकरणे आणि नवे संघर्ष आकार घेत असल्याचे संकेत आहेत.

संपादक : उध्दव नामदेवराव इंगळे





